गडचिरोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील किल्ले वैराटगडावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली. ‘किल्ले वैराटगड एकूण १४ एकरमध्ये पसरलेला आहे. या किल्ल्याला तीन दरवाजे आहेत. त्यातील मुख्य दरवाजा चांगल्या स्थितीत आहे; पण त्याची दोन दारे ढासळली आहेत. काही काळात ती नामशेष होण्याची शक्यता आहे. या किल्ल्यावर पाच विहिरी असून, फक्त एकाच विहिरीत पाणी आहे. गडावरील राजमाहालाची अवस्था फार वाईट आहे. किल्ल्यातील परिकोट बुरुज हा पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत असून, फक्त काही चिरे शिल्लक उरले आहेत. त्या परिकोटाची सीमा १३० ते १४० मीटर एवढी आहे. किल्ल्यावर असलेल्या शिवमंदिराजवळ खाजरीच्या झाडांचे रान मोठ्या प्रमाणात पसरले आहे. किल्ल्यावरील भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार मातीने व झाडाझुडपांनी पूर्णपणे बंद झाले आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत असून, या किल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाने घेतला. प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन विभागामार्फत पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून किल्ल्याच्या तात्काळ डागडुजीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत,’ अशी माहिती रिंगणे यांनी दिली.
रिंगणे यांनीच या मोहिमेचे नेतृत्व केले. चंद्रपूर व गडचिरोली येथील ४० ते ५६ वयोगटातील सदस्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. शशिकांत देशकर, निमेश मानकर, संजय तुरले, लीलाधार भोयर, गणेश गिरीधर आदींचाही त्यात समावेश होता.